बदनाम आपणच होतोय…

December 1, 2006 at 8:12 am | In लेख | Leave a Comment

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये कोण्यातरी माथेफिरू माणसाने बाबासाहेबांच्या प्रतिमेची विटंबना केली. काल दिवसभर संपुर्ण महाराष्ट्रात याचे भयंकर प्रतिसाद उमटत होते. आजही बऱ्याच ठिकाणी संचारबंदी चालू आहे. मुंबाईमध्ये तर काल डेक्कन क्वीन आणि एक लोकल ट्रेनही जाळली.

काय होतय हे आजकाल? कुठे जात आहोत आपण? ही आपलीच चळवळ आहे का? बाबासाहेबांना हेच अपेक्षीत होतं?

आपण बाबासाहेबांचे वाटेने जाणारे ज्ञानमार्गी आहोत. बाबासाहेबांबद्दल आपण सर्वांनाच नितांत आदर आहे.त्यांच्याबद्दल आपल्या भावना इतक्या उत्कट आहेत की त्यांच्याविरुद्ध आपण एक शब्दही सहन करू शकत नाही. हे सगळं बरोबर आहे पण आजकाल आपली चळवळ ज्या मार्गानं जातेय तो मार्ग त्या महामानवाच्या नावाला शोभणारा मुळीच नाही.

आपण प्रत्येक अपमान मुकाट्याने सहन करावेत असं कोणीच म्हणणार नाहे, पण हिंसाचार हा काही बुद्धाचा मार्ग नाही. खैरलांजीमध्ये जे काही झालं ते किंवा कानपुरची घटना ह्या निश्चितच निषेधार्ह होत्या पण आपला मार्ग मात्र चुकीचा होता. यामुळे आपणच बदनाम होत आहोत. ‘यांना दुसरं येतच काय?’ अश्या तऱ्हेच्या प्रतिक्रिया आत्तच यायला लागल्या आहेत.

ही वेळ आहे खरंच आपल्याला काय काय येतं ते दाखवण्याची! ‘यांना दुसरं येतच काय?’  म्हणण्याअगोदर त्यांना दहा हज्जार वेळा विचार करावा लागला पाहिजे,असं करून दाखवण्याची! असं करून दाखवण्याची की यांच्या पायाकालची जमीन सरकली पाहिजेत.

आणि या जमिनीला आताच हादरे बसायला लागले आहेत. बुडाखालच्या सरकारी नोकरीच्या खुर्च्या खिळखिळ्या व्हायला लागल्या आहेत. अशावेळी आपल्या बदनामीसाठी त्यांना बहाणा पुरवण्यात कसला शहाणपणा!

ही आग लवकर विझायला हवी. मनाला नवनवे मोहर फुटू द्या! आसमंत भारून जाऊ द्या आपल्या मोहराच्या सुगंधाने! आपल्याला हा मोहर देणाऱ्या वसंताची पुण्यतिथी लवकरच येतेय. एका नव्या आत्माभिमानाने त्यांना सामोरे जाऊया! पुढच्यावेळी बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर जातांना आपल्या मान लाजेने नाहे तर फक्त कृतज्ञतेनं झुकलेली असावी.

या पुन्हा एकदा मनापासून प्रतिज्ञा करूया-

“पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि”
(मी सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करेन अशी मी प्रतिज्ञा करते/करतो)

साधू! साधू!! साधू!!!

Blog at WordPress.com. | Theme: Pool by Borja Fernandez.
Entries and comments feeds.